"रस्त्यावर उतरून भेळपूरी खायला जाल तरी वाद होतील"

मुंबई: राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी - गोडसे' हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या सिनेमात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे. ट्रेलर लाँच निमित्ताने चिन्मय मांडेकरला या भूमीकेसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा चिन्मयने पत्रकारांच्या प्रश्नावर स्वतःची रोखठोक भूमिका मांडत उत्तर दिल.चिन्मय म्हणाला , "याआधी सुद्धा काही कलाकारांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. खासकरून मराठी रंगभूमीवर कलाकारांनी हि भूमिका रंगवली आहे. जेव्हा जेव्हा कोणी हि भूमिका साकारली आहे तेव्हा तेव्हा वाद झाले आहेत. आता एक कलाकार म्हणून या वादांकडे किती लक्ष द्यायचं हे तुमच्यावर आहे. आजकाल तुम्ही रस्त्यावर उतरून भेळपुरी खायला जाल तरी वाद होतील असं वातावरण आहे. त्यामुळे वाद निर्माण करायला कोणतीही अक्कल लागत नाही."




चिन्मय पुढे म्हणाला,"एक कलाकार म्हणून आपल्याला फक्त काम करायचं आहे. माझ्याकडे जेव्हा हा सिनेमा आला, जेव्हा राजकुमार सरांनी मला सिनेमाची कथा ऐकवली तेव्हा या सिनेमाचं नेमकं म्हणणं काय याचा मी विचार केला. सिनेमातुन जो उद्देश आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय तो जर महत्वाचा असेल तर तुम्ही हिरो, खलनायक किंवा अगदी रावणाची भूमिका जरी रंगवली तरी ते महत्वाचं नसतं."चिन्मय शेवटी म्हणाला कि, "जेव्हा तुम्ही नथुराम गोडसेसारखी भूमिका करता तेव्हा मनात कुठेतरी माहीत असतं कि यातून वाद निर्माण होऊ शकतो. पण याचा जास्त विचार मी करत नाही. त्यापलीकडे मी विचार केला तर मी ती भूमिका साकारू शकत नाही. अभिनय करणं हे माझं काम आहे. वाद निर्माण करणं माझं काम नाही. ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी करावे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने