पंतप्रधान इंदिरा-राजीव गांधींच्या हत्येबाबत भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान; जोशी म्हणाले, तो 'अपघात' होता

डेहराडून : उत्तराखंडातील भाजप सरकारमधील  मंत्री गणेश जोशी  यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी  आणि राजीव गांधी  यांच्या हत्येला हौतात्म्य नव्हे तर अपघात असल्याचं म्हटलंय.राहुल गांधींवर निशाणा साधत मंत्री जोशी म्हणाले, अपघात आणि हौतात्म्य यात फरक आहे. एखाद्याचा अपघात झाला तर तो अपघातच असतो. दोघंही आमचे पंतप्रधान आणि मोठे नेते होते, पण त्यांच्यासोबत अपघात झाला, असं ते म्हणाले. भारत जोडो यात्रेच्या  समारोपीय भाषणात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री जोशींनी ही प्रतिक्रिया दिलीये. जोशी म्हणाले, हौतात्म्यावर गांधी घराण्याची मक्तेदारी असू शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, वीर सावरकर आणि चंद्रशेखर यांचं हौतात्म्य आपण पाहिलं आहे. हौतात्म्य आणि दुर्घटना यात फरक आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.



मंत्री जोशी इथंच थांबले नाहीत ते पुढं म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं, त्यामुळं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पडली आणि त्यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. कलम 370 हटवलं नसतं तर राहुल गांधी तिथं जाऊ शकले नसते, असंही ते म्हणाले.30 जानेवारीला भारत जोडो यात्रेत राहुल गांधी म्हणाले होते, मला आजी आणि वडिलांच्या हत्येबाबत फोनवरून माहिती देण्यात आली होती. हिंसा भडकावणाऱ्यांना ती वेदना काय समजणार? भाजप आणि आरएसएसच्या लोकांना हे दुःख कधीच समजणार नाही. तर दुःख काय असतं ते सैनिकांच्या कुटुंबाला समजेल, पुलवामा शहीदांच्या कुटुंबाला समजेल आणि काश्मिरींना समजेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने