मुंबई: महिला टी २० विश्वचषक आजपासून (१० फेब्रुवारी) सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्या या विश्वचषकात भारतीय संघ आपला पहिला सामना १२ फेब्रुवारीला रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. महिला भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण १३ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
यामध्ये भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ तीन सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत या सामन्यातही भारताच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे. स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्स या चार खेळाडूंच्या खांद्यावर भारताची फलंदाजी अवलंबून असणार आहे.भारताकडे दीप्ती शर्माच्या रूपात मॅचविनर अष्टपैलू खेळाडू आहे.