अहमदाबाद: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. द्विशतक झळकावताना तो हुकला, पण या काळात त्याने अनेक विक्रम केले. कोहलीने शतक पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले. त्याचवेळी अनुष्काने सोशल मीडियावर एक मोठा खुलासा केला आहे.
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोहलीचा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने सांगितले की, विराट आजारी असतानाही एवढी मोठी खेळी खेळला. त्याला अशक्तपणा जाणवत होता. अनुष्काने लिहिले की, इतक्या संयमाने आजारपणात फलंदाजी केली आहे. तू मला नेहमीच प्रेरित केले आहे. कोहलीने 1205 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले. त्याचे हे 28 वे कसोटी शतक आहे. विराटने शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे केले होते.विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला. कोहलीचे सर्वात संथ शतक 2012 मध्ये नागपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध केले होते. त्या सामन्यात त्याने आपल्या शतकासाठी 289 चेंडूंचा सामना केला होता.
काय घडलं मॅचमध्ये?
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या 180 आणि कॅमेरून ग्रीनच्या 114 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 128, विराट कोहलीच्या 186 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या जोरावर 571 धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 91 धावांची आघाडी मिळाली.प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या.