तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर..; शिखर परिषदेत काय म्हणाले मोदी?

नवी दिल्ली : गेल्या शतकात काही देशांनी येणार्‍या पिढ्यांबद्दल विचार न केल्यामुळं हवामान बदलांसारखी संकट आली आहेत. लाईफस्टाईलचा प्रभाव देखील वसुंधरेवर पडत आहे. परंतु, आपण ठरवलं तर पृथ्वीला या संकटातून वाचवू शकतो, असं स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.आज जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेच्‍या  उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तथागत बुद्धांनी  दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर हवामान बदलांसारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता, असंही मोदी म्हणाले.



मोदी पुढं म्हणाले, प्रत्येक व्यक्ती हवामान बदलाच्या समस्येचा सामना करू शकतो. नागरिकांना जागरुक होवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रयत्नानं या मोठ्या समस्येला तोंड दिलं जावू शकतं आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे. जगाला सुखी करायचं असेल तर स्वतःमधून बाहेर पडून जगाची संकुचित विचारसरणी त्यागली पाहिजे. संपूर्णतेचा हा बुद्धानं दिलेला मंत्रच एकमेव मार्ग आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.‘परियक्ति, पटिपत्ती तसंच पटिवेध’ हा बुद्धाचा मार्ग आहे. गेल्या 9 वर्षात भारत या तीन ही बिंदुंवर वेगानं मार्गक्रमण करत आहे, असंही मोदींनी सांगितलं. या परिषदेत जवळपास 30 देशांचे 171 प्रतिनिधी तसेच भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने