महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचीही होणार गच्छंती? निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता

दिल्ली: भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातून उचलबांगडी झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र आता राज्यपाल रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तशा हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत.तर दुसरीकडे राज्याला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, छत्तीसगड जिंकण्यासाठीच रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केलं जाणार आहे.



छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्यासारखा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यावर भाजपचा भर आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.त्याचबरोबर पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वमान्य चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून छत्तीसगडवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

तर रमेश बैस यांनी जुलै 2021मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यापूर्वी जुलै 2019 ते 2021पर्यंत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. 2019मध्ये भाजप दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.छत्तीसगड रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या नेत्याला राज्यपाल म्हणून पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला होता. अविभाजित मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी भोपाळमधून बीएससीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. शिक्षणानंतर अनेक वर्ष त्यांनी शेती केली होती. बैस यांनी पालिका निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.1978मध्ये ते पहिल्यांदा रायपूर नगर पालिकेत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980मध्ये ते हसोद विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 1985मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर 1989मध्ये ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने