फडणवीस-बावनकुळेंच्या नागपुरात भाजपची पाटी कोरी; तेरा पंचायत समित्यांमध्ये एकही सभापतीपद नाही.

नागपूर : सत्ताप्राप्तीसाठी काहीही करणा-या भारतीय जनता पक्षाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे या दोन दिग्गज नेत्यांच्या गृह जिल्ह्यात ( नागपूर) पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत घक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले. १३ पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपला सभापतीपद जिंकता आले नाही. १३ पैकी ९ ठिकाणी काँग्रेस, ३ तालुक्यांत राष्ट्रवादी आणि एका ठिकाणी शिंदे गटाचा सभापती झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोन काँग्रेस, दोन भाजप आणि प्रत्येकी एक राष्ट्रवादी व अपक्ष ( आता शिंदे गट) अशी विभागणी आहे. पंचायत समिती सभापती तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. या पदावर भाजपचा एकही सदस्य नसणे ही बाब अडीच वर्षानंतर होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी चिंता वाढवणारी आहे.




ज्याच्याकडे संख्याबळ त्याच्याकडे पंचायत समिती सभापतीपद असा ढोबळ अंदाज या निवडणुकीत खरा ठरत नाही. कारण सभापतीपदाचे आरक्षण महत्त्वाचे असते. अनेकदा बहुमतात असलेल्या पक्ष किंवा गटाकडे सभापतीपदासाठी आरक्षित संवर्गातील सदस्य नसेल तर त्यांना या पदावर पाणी सोडावे लागते. पण भाजपचा अलीकडच्या काळातील राजकीय इतिहास हा तोडफोडीच्या राजकारणाचा आहे. सत्तेसाठी अनुकूल ज्या गोष्टी पक्षाकडे नाहीत त्या इतर पक्ष फोडून आणायच्या व सत्ता काबीज करायची. या पार्श्वभूमीवर भाजपला जास्तीत जास्त सभापतीपदे पक्षाकडे खेचून आणने अवघड नव्हते. प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांना जिल्ह्याच्या राजकारणाची खडान् खडा माहिती होती. पण त्यांच्या कामठी पंचायत समितीचे सभापतीपद भाजपला राखता आले नाही. अशीच अवस्था पक्षाच्या इतर आमदारांची झाली. शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल यांनी मात्र त्यांच्या रामटेक पंचायत समितीचे सभापतीपद भाजपच्या मदतीने राखले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने