मुंबई: लोकांनी दिलेल्या युती शासनाच्या विचारांपासून व (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून दूर गेलेल्यांनाच मदतीची गरज आहे, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. इथं (कऱ्हाड) आयोजित कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.केसरकर म्हणाले, 'बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली आहे. युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर राहावं, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु, त्यांनी विचारधारा सोडली आहे. एकच दिवस मला पंतप्रधान करा. ३७० कलम रद्द करतो, असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केलं. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना कोण मिठी मारत असेल तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही.'
मंत्री केसकर पुढं म्हणाले, 'सावरकरांबद्दल अनुद्गार सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, ते पूर्ण देशाला माहित आहे. असं असताना यात्रा काढणारे महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुद्गार काढतात. महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. कुणाबरोबरही युती केली म्हणून जनता बरोबर राहत नाही. जनता विकासाबरोबर आहे.'
मोदींना नेता म्हणून जगात मान्यता मिळाली आहे. G20 चे अध्यक्षपद त्यांच्याकडं आहे. ज्याच्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या विचारांच्या विरोधात जाल असाल तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. गद्दार, लाचार कोण, ते जनतेला कळेल. आदित्य ठाकरे वयाने लहान आहेत. त्यांनी राजकारण बघितलेलं नाही. स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिनाभरही गेलेले नाहीत. त्यांना राजकारण म्हणजे काय, लोकांची सेवा म्हणजे काय, हे समजणार नाही. त्यामुळं वाईट बोलणाऱ्यांना सौम्य भाषेत उत्तर दिलं जाणार. पण, ते उत्तर असं असणार की खरी गद्दारी कुणी केली, पदासाठी कोण लाचार झाले. ते जनता पाहत आहे, असंही केसकरांनी स्पष्ट केलं.