नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का! उपशहर अध्यक्षासह ५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी मुंबई: शहरामध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्षांसह 5 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे.नवी मुंबईमध्ये मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. नवी मुंबईत मनसेच्या उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्यासह 5 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. मनसेचे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे कामामध्ये अडचणी येत असल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचे महानगरपालिकेत आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अधिकारी आमच्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने पक्षात नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.



नवी मुंबईतही मनसेत पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईत नेतृत्वबद्दल करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होत आहे. प्रसाद घोरपडे बोलताना म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मी पदावर असल्यापासून मला अंतर्गत बाबींमध्ये त्रास द्यायचा प्रयत्न सुरू होता. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत सांगितले. त्यासंबधी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या नवी मुंबई उपशहर अध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपावला आहे'.पुढे बोलताना ते म्हणाले की, 'गजानन काळे हे माझ्या विरोधात बैठक लावत होते. मी तीन-चार घरी होतो, त्यावेळी कोणत्याही प्रकारची विचारपूस करण्यात आली नाही. मला गजानन काळे यांनी कार्यालयात येऊन धमकी दिली होती, असेही घोरपडे म्हणाले आहेत. घोरपडे यांच्या आरोपावर गजानन काळे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने