मुंबई: मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना भारतीय संघाबाबत भाष्य केलं आहे. त्याने यावेळी मोठं संकेत दिले आहेत. मुंबई इंडियन्सचा असा एक खेळाडू आहे जो लवकरच भारताच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना रोहितने तिलक वर्माचे तोंडभरुन कौतुक केले आहे. तिलकने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 17 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी केली. यामुळे मुंबई संघाने मोठी धावसंख्या गाठली. रोहितही तिलकच्या खेळीमुळे खूश आहे. त्याने तिलक लवकरच इतर संघात खेळणार असल्याचे संकेत दिले.
हैदराबादमध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. मी येथे तीन वर्षे खेळलो. ट्रॉफीही जिंकली. इथे पुन्हा खेळायला मला आवडेल. आमच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे यापूर्वी आयपीएल खेळले नाहीत. पण त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल.सध्या नवे खेळाडू लय शोधत आहेत. पॉवरप्लेमध्ये काही धावा मिळाल्याचा आनंद आहे. मला वाटते की आपल्यापैकी एकाला मोठी फलंदाजी करावी लागेल. आमची फलंदाजी मोठी आहे. युवा खेळाडूंनी मोकळेपणाने फलंदाजी करावी अशी माझी इच्छा आहे.तसेच गेल्या सीझनपासून तिलक वर्माला खेळताना पाहिले आहे. तो काय करु शकतो हे सर्वांना माहिती आहे. मला त्याचा दृष्टिकोन आवडतो. तो गोलंदाजी करत नाही पण चेंडूला खेळवतो. अशा शब्दात तिलकचं कौतुक करत आम्ही लवकरच त्याला इतर काही संघांसाठी खेळताना पाहू. असं मोठं विधान रोहितने केलं आहे.