लोकसभेत भाजपच्या ११० जागा कमी होणार! मविआला किती जागा मिळणार?

मुंबई: भाजपचा अंतर्गत सर्व्हे बाहेर कसा आला. हा पहिला प्रश्न आहे. कोणत्याही सर्व्हे शिवाय सांगू शकतो. संपूर्ण लोकभावना भाजपच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रात भाजपने मिंधे गटाबरोबर केमिकल लोचा करुन ठेवला आहे. संपूर्ण जनमत या लोचाविरुद्ध आहे. हिमंत असेल तर आता महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान १८५ आणि लोकसभेच्या ४० च्या दरम्यान जागा आम्ही जिंकू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. देशाचा विचार करायचा झाल्यास तर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान झारखंड, छत्तीसगढ ही राज्य भाजपला पाठीशी घालणार नाहीत. भाजपच्या लोकसभेच्या किमान १०० ते ११० जागा कमी होतील, असं चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी  सर्व्हेची गरज नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. 



शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सातत्याने राजीनामे मागत होते. त्यांनी दोन राजीनामे घ्यावे. खारघर येथील घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला हवा. यावर सरकार गप्प आहे. तसेच त्यांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. मंत्री संयज राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्या कार्यकत्यांनी समोर आणला आहे. त्यामुळे त्यांनी राठोडांचा देखील राजीनामा मागितला पाहीजे. खारघर येथील खरी आकडेवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लपवत आहेत. आता १४ लोक मृत्यू पावले आहे. २० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री, आयोजक आणि सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगवे. 

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला होता. यावर संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेना फुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता?फोडण्याचं कारण काय शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता. ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल. त्यासाठी जर आमच्यावर कोणी खापर फोडणार असले तर ही गंमत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने