कोकणासाठी रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या

पुणे : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी आणि पनवेल-रत्नागिरी या साप्ताहिक गाड्या सोडण्यात येत आहेत.

उन्हाळी सुट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना गर्दीही वाढली आहे. रेल्वेने ही गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. पुणे आणि पनवेलमधून रत्नागिरीसाठी या साप्ताहिक विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. एकूण १६ गाड्या सोडण्यात येणार असून, त्या अनारक्षित असणार आहेत.



पुणे-रत्नागिरी ही गाडी ४ मे ते २५ मे या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर गुरूवारी पुण्यातून रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. ती रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दर शनिवारी दुपारी १ वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत.

पनवेल-रत्नागिरी ही गाडी ५ ते २६ मे या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पनवेलहून सुटेल. ती रत्नागिरीला शनिवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. रत्नागिरीहून ही गाडी शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने