कोयना कोरडेठाक, सात टक्केच पाणीसाठा; पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची भीती

सांगली : यंदाचा कडक उन्हाळा आणि लांबलेल्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातील महत्त्वाची मानली जाणारी कोयना आणि चांदोली धरणे कोरडीठाक पडण्याच्या उंबरठय़ावर आहेत. कोयना धरणात मंगळवारी सकाळी फक्त ७.१२, तर चांदोली धरणात ४.७५ टीएमसी पाणीसाठा होता. यामुळे सांगलीसह कृष्णा-वारणा काठच्या गावांना भीषण पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. विदर्भ, मराठवाडय़ात मात्र समाधानकारक पाणीसाठा आहे.

मोसमी पाऊस लांबल्याने सध्या राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी होत आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये तर मंगळवारी उपयुक्त पाणीसाठा फक्त ७.१२ टीएमसी (७ टक्के) होता. ३४.४० टीएमसी क्षमतेच्या चांदोलीमध्येही उपयुक्त पाणीसाठा ४.७५ टीएमसी (१७ टक्के) एवढा खाली घसरला आहे. तापमानातील वाढ आणि लांबलेला पाऊस विचारात घेता या उपलब्ध पाणीसाठय़ावरच आणखी काही दिवस काढावे लागणार आहेत. नदीकाठच्या गावा-शहरांच्या पाणी योजना, दुष्काळी भागासाठीच्या उपसा सिंचन योजना चालवणेही या पाणीटंचाईमुळे अवघड जाणार आहे. हे संकट लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजना यांच्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही टंचाई अशीच राहिल्यास केवळ पाणीपुरवठय़ासाठी पाणी पुरवणे अत्यावश्यक होणार असून, अन्य उपशावर बंदी आदेश लागू करणे अपरिहार्य होणार असल्याचे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले.




अनेक पाणी योजना बंद

कोयना धरणातून सध्या केवळ १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. या पाण्यावर सध्या नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि काही प्रमाणात सिंचनाचे काम होत आहे. मात्र लवकरच हा विसर्गही बंद करावा लागणार असल्यामुळे कृष्णा-वारणा काठच्या गावांना भीषण पाणीटंचाई भासण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणी नसल्यामुळे ताकारी उपसा सिंचन योजनेचे पंप बंद झाले आहेत. टेंभू, म्हैसाळ या दोन उपसा सिंचन योजनांचे आवर्तन देखील अंशत:च सुरू आहे. परंतु, पाण्याअभावी लवकरच या योजनाही बंद कराव्या लागणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठी पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

विदर्भातील मोठय़ा धरणांत ४० टक्के जलसाठा

मोसमी पाऊस विदर्भाच्या उंबरठय़ावर असला तरी मागच्या काही महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे धरणातील जलसाठय़ांमध्ये मात्र घसरण झाली आहे. विदर्भातील धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात एकूण दहा मोठी धरणे आहेत. त्यांची साठवणूक क्षमता २२६३ द.ल.घ.मी असून त्यात सध्या ९६४ दलघमी (४०.८२ टक्के) साठा आहे. नागपूर विभागात एकूण १६ मोठे प्रकल्प असून, त्यात सध्या १४३० द.ल.घ.मी (४१.३१ टक्के) पाणी आहे.

मराठवाडय़ात धरणात पाणी, पुरवठय़ातील अडचणी कायम

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३२.५२ टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाणी आहे, पण ते नळाला मात्र येत नाही, ही गेल्या दोन दशकांपासून असणारी औरंगाबाद शहरची समस्या कायम आहे. गेल्यावर्षी १३ जून रोजी ३३ टक्के पाणीसाठा होता. निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार, निन्म तेरणा, विष्णुपुरी, सीनाकोळेगाव या धरणांमध्ये अजूनही ३७.६६ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी खोऱ्यातील सिद्धेश्वर वगळता सर्व धरणांमध्ये पाणीसाठा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने