रतन टाटांचे औदार्य! पावसात प्रत्येक कार चालक अन् मालकाला केले ‘हे’ आवाहन; ‘या’ ट्विटने जिंकली लाखो युजर्सची मने

 भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे नाव जर तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला त्यांचे प्राणी प्रेम देखील माहितच असले. रतन टाटा नेहमीच प्राण्यांच्या हक्कासाठी लढत असतात. अनेकदा विविध प्राण्यांना गोंजरताना त्यांना आपण पाहिले, विशेषत: श्वानावर त्यांचे विशेष प्रेम दिसून येते. अनेकदा ते प्राण्यांसंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात. आत्ताही त्यांनी पावसाळा सुरू झाल्यामुळे भटक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी एक जनजागृती करणारी पोस्ट शेअर केली आहे. कुत्रे आणि भटक्या प्राण्यांवर त्याचे प्रेम अफाट आहे हे ते अनेक प्रसंगी व्यक्त करताना पाहिले आहे.

रतन टाटा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, पावसाळ्यात वाहन चालकांसाठी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यात चालकांनी गाड्या चालवण्याआधी किंवा जास्त वेगाने वाहन चालवण्याआधी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले कारण काही वेळा पावसाल्यात अनेक भटके प्राणी वाहनांच्या खाली जाऊन लपतात, यामुळे त्यांना इजा होऊ शकते. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसात भटक्या प्राण्यांना तात्पुरता निवारा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.



रतन टाटा यांनी एका कु्त्र्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे. की, ‘आता पावसाळा सुरु झाला आहे, खूप भटक्या मांजरी आणि कुत्रे आपल्या गाड्यांखाली आसरा घेतात. आश्रय घेणाऱ्या भटक्या प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून गाडी सुरू करण्यापूर्वी आणि वेग वाढवण्यापूर्वी तपासणे महत्त्वाचे आहे. आपल्या वाहनांखाली जर कोणता प्राणी असेल आणि ते आपल्याला माहित नसेल तर तो गंभीर जखमी, अपंग किंवा मृत्यूमुखी पडू शकतो. या हवामानात पाऊस पडत असेल तर आपण सर्वांनी त्यांना तात्पुरता निवारा दिला तर ती ह्रदय जिंकणारी गोष्ट ठरेल.

रतन टाटा यांनी भटक्या प्राण्यांशी संबंधित गंभीर विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांचे कौतुक करत आहेत. या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. पण या पोस्टवर तुमचे काय मत आहे हे आम्हाला आमच्या विविध सोशल मीडिया अकाउंटच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने