विराट-रोहित टीम इंडियातून ‘आऊट’; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

BCCI ने बुधवारी (५ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. माजी क्रिकेटर अजित आगरकर यांची बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही घोषणा करण्यात आली. यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांसारख्या नवख्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्याला कर्णधार पद आणि सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. याशिवाय रवी बिश्नोई आणि आवेश खान यांचंही संघात पुनरागमन झालं आहे.

केएल राहुल आणि ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे संजू सॅमसनही संघात संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांचीही निवड झाली आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मात्र संघात स्थान मिळालं नाही.



खरं तर, गेल्या महिन्यात ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय कसोटी संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आलं. तर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश करण्यात आला होता.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंची टीम इंडियात निवड

इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने