राज्यात पुढील पाच दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याकडून राज्याच्या अनेक भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



राज्यात गेल्या ४८ तासांपासून पावसाने जोर पकडला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेकडून पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे निर्माण झाल्याने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे. पुढील पाचही दिवस मराठवाडा विभाग वगळता तीन विभागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोव्यात आणि विदर्भात पुढील पाचही दिवस पाऊस पडणार आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१, २२ आणि २३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने