राज्यावर पुढच्या २-३ तास अस्मानी संकट, कोल्हापूरसह १० भागांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. अशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशात पुढच्या २-३ तासांसाठी हवामान खात्याकडून महत्त्वाच्या भागांना अलर्ट जारी केला असून नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, आणि मराठवाड्यातील काही भागांवर, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर आणि इतर राज्यांमध्ये कर्नाटक, उत्तर केरळ, तेलंगणा किनारपट्टीवरील आंध्र, दक्षिण ओडिशाच्या काही भागांवर मध्यम ते तीव्र ढग असतील. यामुळे पुढच्या २ ते ३ तासांमध्ये या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.




दरम्यान, बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत आहे. या प्रणालीसोबतच अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावशाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून हा जोर २८ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

यामुळे शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारसाठी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पालघर, ठाण्यासह मुंबईतही ऑरेंज अलर्ट कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने