सुधा मूर्ती होत्या टाटा मोटर्सच्या पहिल्या महिला अभियंता, थेट जेआरडी टाटांनाच लिहिले संतप्त पत्र अन् घडला ऐतिहासिक बदल

आजच्या काळात भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकवत आहेत. परंपरेने पुरुषांचा व्यवसाय मानल्या गेलेल्या अशा क्षेत्रातही त्या पुढे येत आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह आणि मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहानेही अनेक वर्षे अत्यंत पुराणमतवादी विचारांतर्गत काम केले, परंतु वर्षानुवर्षे चालत आलेली ती प्रथा संपवण्यात एका महिलेच्या पत्राने सर्वात मोठी भूमिका बजावली. सुधा मूर्ती असे त्या महिलेचे नाव आहे. सुधा मूर्ती या टाटा मोटर्सच्या पहिल्या महिला अभियंता होत्या.

कंपनीतील ऐतिहासिक बदलाच्या त्या साक्षीदार होत्या. खरं तर त्या जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होत्या, तेव्हा त्यांनी कॅम्पसमध्ये टाटा मोटर्सने लावलेल्या जाहिराती पाहिल्या. कंपनी इंजिनीअर्सच्या शोधात होती. मात्र, या जाहिरातीत सुधा मूर्ती यांना एका गोष्टीने हैराण केले. ही जागा फक्त पुरुषांसाठी आहे, असे त्यात लिहिले होते. त्याकाळी अभियांत्रिकी हा केवळ पुरुषांचा व्यवसाय मानला जात असल्याने कंपनी ‘नो वुमन पॉलिसी’ अंतर्गत काम करीत होती. ही गोष्ट सुधा मूर्ती यांना काही रुचली नव्हती.



जेआरडी टाटा यांना लिहिले संतप्त पत्र

सुधा मूर्ती सांगतात की, एके दिवशी त्या कॉलेजमधून त्यांच्या वसतिगृहात परतत असताना त्यांना TELCO (आताची टाटा मोटर्स) कडून अभियंते पदासाठी अर्ज मागवणारी नोटीस दिसली आणि चांगल्या पगाराचे आश्वासन त्यावर दिले होते. परंतु महिला विद्यार्थिनींनी अर्ज करू नये, असे या नोटिशीच्या शेवटी लिहिले होते. सुधा मूर्ती सांगतात की, त्या २३ वर्षांच्या होत्या आणि या वयात अशा गोष्टी वाचून राग येणं स्वाभाविक आहे. त्यांच्या असंतोषाबद्दल त्यांनी सर जेआरडी टाटा यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी पत्रात लिहिले की, “सर जेआरडी टाटा जेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हा आपल्या देशाने केमिकल्स, लोकोमोटिव्ह, लोह आणि पोलाद उद्योग सुरू केले. तुम्ही नेहमी वेळेच्या पुढे असता. आज समाजात ५० टक्के पुरुष आणि ५० टक्के महिला आहेत. जर तुम्ही महिलांना संधी दिली नाही तर तुम्ही महिलांकडून सेवा करण्याची संधी हिरावून घेत आहात. त्यामुळे देश पुढे जाणार नाही. जर महिलांनी शिक्षण घेतले नाही आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत, तर हा समाज आणि देश कधीच प्रगती करू शकणार नाही, ही तुमच्या कंपनीची चूक आहे, असंही त्यांनी पत्रात नमूद केले.

…अन् ऐतिहासिक निर्णय आला

त्यांच्या पत्राचा परिणाम असा झाला की, टाटा समूहाने नो वुमन पॉलिसी रद्द केली. अशा प्रकारे सुधा मूर्ती टेल्कोच्या पहिल्या महिला अभियंता बनल्या, जी कंपनी आता टाटा मोटर्स आहे. कालांतराने सुधा मूर्ती यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी विवाह केला, ज्यांची एकूण संपत्ती आज सुमारे ३६,००० कोटी रुपये आहे. सुधा मूर्ती या इन्फोसिसमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. महिलांच्या कल्याणासाठी आयटी क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने