एक महिना गहू खाणं बंद केल्यास शरीर कसं बदलेल? पोळ्या टाळून वजन कमी होणार का, वाचा तज्ज्ञांचं उत्तर

गहू आणि धान्य-आधारित पदार्थ आपल्या आहाराचा सर्वव्यापी भाग बनले आहेत. मराठमोळ्या घरात तर गव्हाच्या पोळ्या या नियमित आहाराचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखल्या जातात. शिवाय अनेक आजारांमध्ये पोळ्यांचे सेवन हा सुरक्षित पर्याय आहे असेही मानले जाते. पण यात कितपत तथ्य आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यापूर्वी काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डायबिटीज रुग्णांसाठी गव्हाचे सेवन हे नुकसानदायक असल्याचे समोर आले आहे. शिवाय ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा गव्हाची पोळी ही सर्वात योग्य पर्याय नाही असेही सांगणारे अभ्यास प्रकाशित झाले आहेत.

अशा स्थितीत, आपल्या आहारातून गहू पूर्णपणे काढून टाकणे योग्य आहे का? याव्यतिरिक्त, आपण एक महिना गहू न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज वरिष्ठ आहारतज्ज्ञ लक्ष्मी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. लक्ष्मी या कामिनेनी हॉस्पिटल, हैदराबाद येथे कार्यरत आहेत.




आहारातून गहू काढून टाकण्याचे फायदे

1)रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर करणे: गहू हे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे धान्य म्हणून ओळखले जाते. तुमच्या आहारातून गहू काढून टाकल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते, जे विशेषतः मधुमेहींसाठी उपयुक्त आहे. ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि लठ्ठपणा यासारख्या इतर परिस्थितींना प्रतिबंध करण्यास देखील हा प्रयोग मदत करू शकतो.

2) पचन सुधारते: गव्हामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. अशावेळी गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आतड्यांमध्ये अडथळे येतात किंवा पचन मंदावते, ज्यामुळे गॅस, गोळा येणे, मळमळ, पोटदुखी, उलट्या आणि पेटके येणे असे त्रास होऊ शकतात. कमी गहू खाल्ल्याने पचनसंस्थेला ब्रेक मिळू शकतो.

3) वजन कमी होणे: रिफाइन्ड कार्ब्स तुमचे वजन वाढवतात. केवळ गव्हाच्या पोळ्याच नव्हे तर रिफाईंड गव्हापासून बनवलेला व्हाईट ब्रेड, पिझ्झा, क्रॅकर्स, बर्गर, पास्ता इ. हे पदार्थ कितीही खाल्ले तरी पोटभरल्याची तृप्त भावना निर्माण करत नाहीत. याव्यतिरिक्त, गहू-मुक्त आहार घेतल्यास तुमच्या शरीराचा उष्मांक कमी होऊन वजन नियंत्रणात मोठी मदत होऊ शकते.

4) सेलिआक रोगाचा धोका कमी होतो: गहू खाल्ल्याने तुम्हाला सेलिआक रोग होण्याचा धोका असतो. ही एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे जी अनुवांशिकदृष्ट्या पूर्वस्थिती असलेल्या लोकांमध्ये आढळते. यामध्ये ग्लूटेन (गव्हातील प्रथिनांचा एक भाग) घेतल्याने लहान आतड्याचे नुकसान होते.

आपल्या आहारातून गहू वगळण्याचे तोटे

1)दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा धोका: गव्हामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करतात. तुमच्या आहारातून फायबरयुक्त गहू काढून टाकल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठता होऊ शकते.

2) ब जीवनसत्वाची कमतरता: गहू हा व्हिटॅमिन बी चा स्त्रोत आहे. या आवश्यक पोषक तत्वाशिवाय, तुमचे शरीर योग्यरित्या कार्य करू शकणार नाही कारण हे जीवनसत्व अन्नातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि पेशी आणि ऊतींचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक आहे.

गव्हाला पर्याय काय?

जर तुम्ही तुमच्या आहारातून गहू काढून टाकण्याचा विचार करत असाल, तर त्याऐवजी खालील पर्याय विचारात घेऊ शकता

  • फायबर, लोह आणि मॅग्नेशियम, प्रोटीनचा स्रोत असणारा क्विनोआ
  • हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर प्रदान करणारे ओट्स
  • उच्च फायबर आणि आवश्यक खनिजे युक्त ब्राऊन तांदूळ,
  • फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या खनिजांनी समृद्ध ग्लूटेन-मुक्त ज्वारी, बाजरी

दरम्यान, आहारतज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले की एखाद्याच्या आहारातून गहू काढून टाकायचा की नाही हे ठरवणे अनेक घटकांवर अवलंबून असते. “सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलतेचे निदान झाल्यास, प्रभावी व्यवस्थापनासाठी गहू काढून टाकणे महत्वाचे आहे. योग्य मार्गदर्शनासाठी आणि पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी नोंदणीकृत आहारतज्ज्ञांसारख्या आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा. तथापि, विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती नसलेल्या व्यक्तींसाठी, संपूर्णपणे गहू काढून टाकणे अनावश्यक असते. गहू फायबर, व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक पुरवतो, ज्यामुळे एकंदर आरोग्याला मदत होते.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने