आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणं तुम्हालाही शक्य आहे!

चवीनं खाणं आपल्यापैकी बहुतेकांना आवडतंच, पण त्याबरोबर आरोग्य सांभाळणंही महत्त्वाचं असतं. अर्थातच त्यासाठी घरी केलेल्या आरोग्यदायी स्वयंपाकाचं महत्त्व आहे. त्यानं आजारपण टाळणं किंवा आटोक्यात ठेवायला मदत होईल आणि एकूण आरोग्य चांगलं राखणं शक्य होईल. आता मुद्दा असा आहे, की आरोग्यदायी स्वयंपाकासाठी जास्त खर्च येतो का? महागडे जिन्नस, महागड्या किंवा परदेशी भाज्या-फळं, विशेष आणि महागडं साहित्य आणि तशीच भांडी त्यासाठी लागतात का? याचं उत्तर ‘नाही’ असंच.

घरच्या घरीच आपण जर थोडी विचारपूर्वक स्वयंपाकाची तयारी केली, थोडेसे कष्ट घ्यायची तयारी असेल, खरेदीचं आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचं चांगलं नियोजन केलं, गरज भासेल तिथे इतरांचीही मदत घेतली, स्वच्छ आणि ताजे जिन्नस निवडून आणले, तर तुम्हालाही आरोग्यदायी स्वयंपाक करणं सहज शक्य होईल. त्यासाठी आहारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांची थोडी माहिती आपण घ्यायला हवी.




रोजचे पदार्थ- उदा. रोजच्याच भाज्या वेगळ्या पद्धतीनं केल्या, की घरातले सगळे आनंदानं खातात याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. कारण पदार्थ तयार करण्याची पद्धत बदलल्यावर त्याच्या चवीत फरक पडतो. पदार्थाचं रंगरूपच पालटून जातं.

म्हणजे बघा हं, पालकाची ताजी भाजी आणली, निवडून, धुवून तयार ठेवली, की तिचे किती तरी वेगवेगळे प्रकार करणं शक्य आहे…

  • पालक चिरून, त्यावर फोडणी देऊन आणि खोबरं, कांदा, मिरची, मीठ घालून, कालवून मस्त पचडी करता येईल.

  • शिजवून, वाटून घेतलेला पालक घालून ‘पालक राईस’ करता येईल.

  • पालक चिरून, प्रेशर पॅनमध्ये फोडणीस टाकून, पाणी घालून शिजवलं की भाजी करता येईल.

  • पीठ पेरून गोळाभाजी करता येईल.

  • पालकाचे मुठिया करून ते वाफवता येतील.

  • ओव्हनमध्ये बेक करून पालकाचा एखादा पदार्थ होऊ शकतो.

  • पालकाचं सूपही छान लागतं.

  • बेसन किंवा कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये पालकाची पानं घोळवून तळली की कुरकुरीत भजी होऊ शकतात.

  • पालक पराठे, पालक ठेपले, पालक पुऱ्या… किती पदार्थ एकाच भाजीपासून होऊ शकतात पाहा!

खाद्यसंस्कृती किती वैविध्यपूर्ण आहे ना!

जसे एकच घटक पदार्थ वापरून आणि स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून वेगळे पदार्थ बनतात, तसंच वैविध्य पदार्थ शिजवण्याआधी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेतही आहे.

म्हणजे बघा:

  • मोड आणणं- यात व्हिटॅमिन ‘बी’ आणि ‘सी’चं प्रमाण वाढतं. प्रथिनांचं पचन सुलभ होतं. लोहाचं शोषण सुधारतं.

  • विरजणं- दुधाला थोड्या दह्याचं विरजण लावलं की सूक्ष्मजीवांमुळे दही तयार होतं. पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे प्रोबायोटिक्स त्यात असतात.

  • ब्रेड वगैरे करताना पिठात यीस्ट वापरलं की पीठ फुगतं आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनचं प्रमाण वाढतं.

  • ताक घुसळणं- दही किमान २-३ मिनिटं घुसळलं, तर त्यातल्या प्रथिनांचं ‘डीनेचरेशन’ होऊन ताक पचायला हलकं होतं.

  • पीठ (बॅटर वगैरे) आंबवणं- सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळे त्या पदार्थाची पोषकता वाढते.

पदार्थ आपण कशा पद्धतीनं शिजवतोय, त्यावरून त्यातल्या सूक्ष्म अन्नघटकांचं प्रमाण टिकून राहील, की कमी होईल, की वाढेल, हे ठरतं. उदा. पदार्थ तळल्यावर त्यातील स्निग्ध पदार्थ आणि कॅलरीजचं प्रमाण नको इतकं वाढतं. पदार्थ जास्त वेळ शिजवला की अत्यावश्यक अन्नघटकांचं प्रमाण कमी होतं.

म्हणजेच स्वयंपाकात वापरले जाणारे जिन्नस, त्यात असणारे अन्नघटक याची मूलभूत माहिती घेण्याबरोबरच पदार्थ शिजवण्याच्या कोणत्या पद्धतींची त्याबरोबर योग्य सांगड घालता येईल, याचीही माहिती आपण घेतली तर त्याचा चांगल्या आहारासाठी उपयोगच होईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने