निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराची अत्यंत गरज भासते. आपण जे खातो त्याचा सरळ आणि प्रभावी परिणाम हा शरीरावर होत असतो. इतकंच नाही तर आपण जे पदार्थ खातो त्यात आपण किती पोषण मूल्य शरीरासाठी वापरतो हेदेखील जाणून घ्यायला हवे. यासाठी कोणत्या पदार्थासह काय खायला हवे हे आयुर्वेदानुसार महत्त्वाचे ठरते.
आपल्याला योग्य आहार आणि त्याचे समीकरण माहीत नसेल तर गुणधर्मविरोधी आहाराच्या सेवनामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आणि शरीराचे यामुळे प्रचंड नुकसान होते. तरूण वयातच अनेक आजार उद्भवतात. याबाबत आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिली आहे, ती नक्की जाणून घेऊया.
आहार आणि आयुर्वेद
आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे वात, पित्त आणि कफरहित अन्नाचे सेवन करणे. अर्थात असे जेवण अथवा असे अन्न जे खाल्ल्यानंतर शरीरामध्ये गॅस, कफ आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होणार नाहीत.
आयुर्वेदानुसार प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा स्वाद, परिणाम आणि पचल्यानंतर वेगळा प्रभाव असतो. त्यामुळे २ वेगवेगळ्या गुणधर्माचे पदार्थ एकत्र खाल्ले तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात विष अथवा अलर्जी जास्त प्रमाणात निर्माण होते.
बॅड कॉम्बिनेशनचा परिणाम
गुणधर्मविरोधी अर्थात बॅड कॉम्बिनेशन असे या आहाराला नाव देण्यात आले आहे. कोणत्याही बॅड कॉम्बिनेशनचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते, रक्तप्रवाह योग्य राहात नाही, त्वचेचे रोग, एंडोक्राईन आणि नर्व्हस सिस्टिमबाबत अनेक आजारांना सामोरे जावे लागते. कोणते आजार उद्भवतात जाणून घ्या -
- जठरातील विकार
- त्वचेचे आजार
- भ्रूण असामान्यता
- अलर्जी
- इरिर्टेबल बाऊल सिंड्रोम
- वंधत्व
- मेटाबोलिक डिसॉर्डर
- अॅनिमिया
- मानसिक विकार
दुधासह वर्ज्य करा हे पदार्थ
दुधासह मांस, मच्छी आणि अंड्यासारखे पदार्थ खाणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण या सर्व पदार्थांची खाद्यशक्ती आणि गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. मांस, मच्छी आणि अंडी हे उष्णतावर्धक पदार्थ असून दूध पोटाला शांत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे हे पदार्थ एकत्र खाणे शरीराला त्रासदायक ठरते
गरम पाण्यासह मध
अनेकदा सकाळी उठल्यानंतर पाणी गरम करून त्यात मध आणि तूप मिक्स करून पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र आयुर्वेदानुसार हे चुकीचे मानले जाते. तूप, मध आणि गरम पाणी या तिन्हीचे गुणधर्म वेगळे आहेत आणि त्यामुळे वजन नियंत्रणासाठी तुम्ही जरी याचा वापर करत असाल तरीही ते चुकीचे आहे.
गरम पदार्थासह थंड पदार्थ
कोणत्याही गरम पदार्थावर अचानक थंड पदार्थ खाऊ नये. उदाहरणार्थ सिझलिंग ब्राऊनी विथ आईस्क्रिम हे कॉम्बिनेशन खरं तर आयुर्वेदानुसार योग्य नाही. अथवा गरम चहानंतर अचानक थंड कॉफी पिणे तुमच्या पोटासाठी योग्य ठरणार नाही. तुम्ही असे कॉम्बिनेशन खातपित असाल तर वेळीच थांबवा.
आंबट फळांसह दूध
आंबट फळं वा भाज्यांसह कधीही दुधाचा वापर करू नये अथवा आंबट फळं खाल्ल्यानंतर त्वरीत दूध पिऊ नये. पोटात यामुळे अॅसिड निर्माण होऊ विषारी पदार्थ अधिक निर्माण होतात आणि पचनक्रियेला त्रास होऊन सतत पोटदुखी, गॅस आणि अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे असे पदार्थांचे कॉम्बिनेशन खाऊ नका.
चहासह लसणाचे पदार्थ
चहा आणि लसूण अथवा लसणाचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. चहामध्ये अँटीकोगुलेन्ट यौगिक असून ज्याला Coumarins असं म्हटलं जातं. जेव्हा लसणासह चहा प्यायला जातो तेव्हा रक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कधीही असे कॉम्बिनेशन खाणे हे चुकीचे ठरते.