शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र का खाऊ नये? शरीरावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

नोंदणीकृत आहारतज्ज्ञ सांगतात की, “शिजवलेले अन्न आणि कच्चे पदार्थ एकत्र न खाण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असा विश्वास आरोग्य आणि आतडे अभ्यासकांना आहे.” याबाबत उदाहरण देताना गोयल यांनी सांगितले की, “जेवणाआधी ३० मिनिटे किंवा जेवणानंतर दोन तासांनी फळांचे सेवन करावे असे सांगितले जाते; कारण त्यामुळे पोटात गॅस तयार होत नाही आणि फोट फुगत नाही.”




शिजवलेले अन्न आणि कच्चे पदार्थ एकत्र का खाऊ नये याची आणखी काही कारणे गोयल यांनी स्पष्ट केली.

  • पचनक्रिया गुंतागुंतीची होते : कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र केल्यामुळे पचनक्रिया गुंतागुंतीची होते. शिजवलेले अन्न पचवणे आतड्यासाठी सोपे असते, कारण ते आधीच शिजलेले असते आणि अशा अन्नाचे सेवन केल्यानंतर शरीरातील एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे शरीराला ते पचवणे सहज शक्य होते. पण, कच्च्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर पचनक्रिया मंदावते”, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
  • पचनासंबंधित समस्या निर्माण होतात : जेव्हा जेवणामध्ये आपण कच्चे पदार्थ आणि शिजवलेले पदार्थ एकत्र खातो, त्यामुळे पचनासंबंधित समस्या निर्माण होतात आणि ढेकर येणे, गॅस होणे आणि अपचन होणे अशा समस्यांमुळे अस्वस्थता निर्माण होते. कारण कच्चे आणि शिजवलेले अन्न एकाच वेळी पचवण्यासाठी आपल्या शरीराराला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा आणि मेहनत करावी लागते. चावणे पचनक्रियेतील पहिली पायरी आहे आणि जर अन्न नीट चावून खाल्ले नाही तर त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण करते. “जेव्हा अन्न शिजवलेले असते, तेव्हा काही पदार्थांमधील फायबर आणि वनस्पती पेशींचे विघटन सहज होते आणि त्यामुळे पचनक्रिया सोपी होते व शरीरात पोषकतत्व मिळवणे सहज शक्य होते”, असे गोयल सांगतात.
  • अन्नाच्या पचनशक्तीवर परिणाम होतो : “आपण जे अन्न खातो त्या पदार्थांचे सर्व आरोग्य फायदे आणि पोषकतत्व मिळत असतील तर ते आरोग्यदायी असते, यालाच आपण अन्नाची पचनशक्ती असे म्हणतो. जेव्हा आपण कच्च्या पदार्थांऐवजी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करतो, तेव्हा ते सहज पचवता येतात आणि त्यात अँटी-न्यूट्रिएंट्सचे प्रमाण कमी असते. अँटी-न्यूट्रिएंट्स हे संयुगे आहे, जे वनस्पतींच्या अन्नातील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी करतात. तसेच त्यामुळे आतड्यामध्ये गॅस निर्माण करण्यासाठीदेखील कारणीभूत ठरतात”, असे गोयल यांनी सांगितले.

“येथे कच्च्या अन्नापेक्षा शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे हा मुद्दा नाही”, असे स्पष्ट करत गोयल यांनी सांगितले की, “आतड्याचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न एकाचवेळी खाणार नाही, अशी जेवणाची पद्धत निर्माण करणे हा मूळ मुद्दा आहे.”

“कच्चे आणि शिजवलेले दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांचे स्वत:चे काही फायदे आणि मर्यादा आहेत, त्यामुळे दोघांचा आहारात समावेश असणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे; पण त्यांचे एकत्र सेवन करू नये”, असे डॉ. डिंपल यांनी नमूद केले. आयुर्वेद आणि आतडे आरोग्य प्रशिक्षक असलेल्या डॉ. डिंपल जांगडा यांनी सांगितले इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती शेअर केली आहे.

कधीही कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र करू नका

डॉ. डिंपल जांगडा यांनी सांगितले की, “कधीही कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र करू नका, कारण त्यामुळे हे एकत्र खाल्ल्यानंतर तुमचे पोट फुगू शकते म्हणजेच गॅस होऊ शकतो.”

“ब्लॉटिंग हा काही आजार नाही, तर तुम्ही आदल्या दिवशी खाल्लेल्या आहाराचा, चुकीच्या पदार्थांच्या सेवनाचा, न पचलेले अन्न आणि विषारी पदार्थांचा परिणाम आहे; जो तुमच्या शरीरातून बाहेर पडलेला नसतो”, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. जांगडा सांगतात की, “धान्य, भाज्या, डाळी, शेंगा यांसारखे पदार्थ स्वयंपाकाचे तेल, मसाले, मीठ आणि औषधी वनस्पती वापरून हे अन्न खाण्यासाठी शिजवले जाते, ज्यामुळे ते शरीराद्वारे सहज पचवले जाऊ शकतात, त्यातील षोषकतत्व सहज शोषले जातात. तसेच अन्न शिजवण्याच्या प्रकियेमुळे या पदार्थांचे रासायनिक गुणधर्म पूर्णत: बदलतात.”

तर दुसरीकडे, “कच्चे पदार्थ, जसे की फळे किंवा भाज्यांचे सॅलेडमध्ये ॲक्टिव्ह फूड ॲसिड्स, फळ आणि भाज्यांमध्ये जिवंत एजाइम असतात. या पदार्थांमध्ये जिवंत असलेले जीवाणू (बॅक्टेरिया) असतात”,, असे डॉ. जांगडा सांगतात.

गोएल आणि डॉ. जांगडा यांच्या मताबाबत सहमती दर्शवत, गुरुग्राम येथील नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, “आपले शरीर शिजवलेले अन्न आणि कच्चे अन्न वेगवेगळ्या पद्धतीने पचवते.”

“शिजवण्याच्या क्रियेमध्ये अन्नातील जटील रेणूंचे विघटन सहज होते आणि अन्नातील पोषकतत्व शोषून घेण्यासाठी सहज उपलब्ध होते. शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र केल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात किंवा षोषकतत्वांचे असंतुलन होते”, असे डॉ. डोंगरे यांनी स्पष्ट केले.

अन्न पदार्थांची सुरक्षितता आणि पचनक्रियेत फरक असल्यामुळे शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र केल्यास आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असेही डोंगरे यांनी स्पष्ट केले.

“शिजवलेले अन्न हे उष्ण गुणधर्माचे असतात, जे घातक जीवाणू नष्ट करतात आणि अन्नातून होणाऱ्या आजाराचा धोका कमी करतात. दुसरीकडे कच्चे अन्न पदार्थ जसे की, कच्चे मासं, मासे किंवा अंडे यामध्ये पॅथोजेन्स म्हणजेच आजाराला कारणीभूत ठरणारे घटक असतात. जर हे पदार्थ व्यवस्थित शिजवले नसतील तर त्यामुळे विषबाधा होऊ शकते”, अस डोंगरे यांनी स्पष्ट केले.

जेव्हा कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र केल्यास ते एकमेकांना दुषित करतात असे डोंगरे यांनी सांगितले. कच्चे फळ किंवा भाज्यांचा रस जेव्हा शिजवलेल्या पदार्थांच्या संपर्कात येतो तेव्हा घातक जीवाणूंचा प्रसार करू शकतात. हे भांडी, भाजी चिरण्याची विळी, चाकू किंवा हातांद्वारे घडू शकते.

तर आपण काय केले पाहिजे?

डॉ. जांगडा यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

  • जर तुम्ही शिजवलेले अन्न खात असाल तर फक्त तेवढेच खा याची खात्री करा आणि जेवणानंतर अर्ध्या किंवा एक तासाने पाणी प्या.
  • जर तुम्ही कच्चे अन्न पदार्थ खात असाल, जसे की फळे आणि भाज्यांचे सॅलेड, तर फक्त तेवढंच खा. (फळ आणि भाज्या एकाच वेळी एकत्र करून खाऊ नका. एका वेळी फक्त फळे किंवा फक्त भाज्या खा) आणि त्यानंतर दोन तासांनी जेवण करा.

“शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र न खाण्याची ही एक सवय तुमच्या आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते आणि चुकीचे पदार्थ एकत्र खाण्यामुळे होणारा त्रास आणि अस्वस्थतेतून सुटका देते”, असेही डॉ. जांगडा यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने