मुंबई: गेली काही दिवस रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे सर्वत्र या चित्रपटाचे दणक्यात प्रमोशन केले गेले. या चित्रपटात बरेच कलाकार मराठी असल्याने मराठी मनोरंजन विश्वातही या चित्रपटाची बरीच हवा झाली, अखेर हा चित्रपट काल 23 डिसेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहितने एका मुलाखतीमध्ये मराठी कलाकारांना तो का संधी देतो त्याबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.रोहितच्या ‘सर्कस’मध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची महत्वपूर्ण भूमिका आहे. या आधीही सिद्धूने रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम केले आहे. सिद्धूच नाही तर अशोक सराफ, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, वैदेही परशुरामी अशा अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी रोहित च्या चित्रपटात काम केले आहे.
त्यामुळे तुझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात, त्यामागे नेमकं काय कारण आहे असे त्याला विचारले गेले. यावेळी तो म्हणाला, 'मी मराठी कलाकारांना चित्रपटात का घेतो? हा प्रश्न मला खूप ठिकाणी विचारण्यात येतो. मात्र, यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार हे एकदम साधे असतात. तत्यांचा अभिनय तर कमालीचा असतोच शिवाय त्यांना कुठलाही अहंकार नसतो.'पुढे तो म्हणाला, 'चांगला अभिनय येतो म्हणून काही कलाकार मंडळी नखरे करताना दिसतात. परंतु, मराठी कलाकारांमध्ये एक खास गुण आहे, तो म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. आमचे चित्रपट १०० कोटींचा बिजनेस करतात, यातला ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. त्यामुळेच माझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात आणि नेहमीच असणार!’