शैलेश लोढा आणि निर्माते असित मोदी वाद पोहोचला कोर्टात ... जाणून घ्या यामागचं कारण..

मुंबई: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांनी एक्झिट घेतल्यानं ही मालिका चर्चेत आलेली पहायला मिळाली.अशीच एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा तारक मेहता,जी साकारात होते शैलेश लोढा. काही महिन्यांपूर्वी अचानक शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याचं समोर आलं आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं. शैलेश लोढा मालिका सोडल्यापासून चर्चेत आहेतच. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव लाइमलाइटमध्ये आलंय.



काही दिवसांपूर्वी बातमी होती की शैलेश लोढा यांना निर्माते असित मोदी यांनी शो सोडून इतके महिने झाले तरी अद्याप पैसे दिलेले नाही. या गोष्टीला जवळपास एक वर्ष झालं. आता थेट वर्षानंतर बातमी समोर येतेय की शैलेश लोढा यांनी असित मोदी विरोधात केस दाखल केली आहे. अभिनेत्यानं आपल्या राहिलेल्या मानधनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपले पैसे शेलेश लोढा आता कायद्याच्या मदतीनं मिळवणार आहेत.शैलेश लोढा यांच्या या केसची सुनावणी पुढील महिन्यात मे मध्ये होणार आहे. बोललं जात आहे की शो सोडल्यानंतर असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्यातील संबंध फार चांगले नव्हते. दोघांमध्ये काही गोष्टींवरनं खटके उडाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.

अर्थात शैलेश लोढा यांनी यावर अद्याप काहीही स्पष्टिकरण दिलेलं नाही. पण असित मोदींनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना मीडियासमोर म्हटलं आहे की,''मी आता काय बोलू यावर..''असित मोदी पुढे म्हणाले,''शैलेश लोढा आम्हाला कुटुंबासारखेच आहेत. मी त्यांचा आदर करतो''. असित मोदीच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक वेळा शैलेश लोढा यांना ऑफिसला येऊन फॉर्मॅलिटी पेपर साइन करण्यास सांगितले होते. कंपनीच्या नियमांचे पालन करून ते आपले पैसे घेऊन जाऊ शकतात. शो चे निर्मात्यांना शैलेश लोढा यांनी त्यांच्याविरोधात केलेली केस अमान्य आहे कारण त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी कधीच पैसे देण्यास नकार दिला नव्हता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने