प्रशासनाला इतकंही कळत नाही का? - राज ठाकरे

मुंबई:  खारघर इथं आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी २० लाखांहूनही अधिक गर्दी जमली होती. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे या सोहळ्यातल्या १२ नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.राज ठाकरे यांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. ठाकरे म्हणाले,"काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?"




"कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे", असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने