"मोदी नावाचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील"

मुंबई: मोदी नावाचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नुकतीच उद्धव ठाकरेंची सभा पाचोरा इथं पार पडली. त्यानंतर बावनकुळेंनी हा घणाघात केला आहे.बावनकुळे नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्यानंतर टीका टिप्पण्या सुरू झाल्या आहेत.



उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, "मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशानं पसंती दिली आहे. मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली पण ते त्यात अपयशी ठरले. खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था झाली आहे."बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. "संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करताय, मोदी नावाचं वादळ येणार आहे. संजय राऊत सवयीप्रमाणे बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणं नाही. पाठीत खंजीर खुपसणं त्यांच्या रक्तात आहे", असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने