२०२१मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत १०१व्या स्थानावर होता. हे स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं. मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. १२१ देशांमध्ये आता भारत १०७व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते.”कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचं मूल्यांकन केलं जातं. त्यानुसार रँकिंग करण्यात येतं. भारताला या निकषांवर २९.१ इतकं रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. हे रँकिंग १० ते १९.९ पर्यंत असल्यास परिस्थिती बरी मानली जाते. २० ते ३४.९ या दरम्यान रँकिंग असल्यास गंभीर, ३५ ते ४९.९ दरम्यान असल्यास चिंताजनक आणि ५०च्यावर रँकिंग असल्यास परिस्थिती भीषण असल्याचं मानलं जातं.
दरम्यान, ही यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात. यामध्ये कुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुलं दगावतात या निकषांच्या आधारे जागतिक भूक निर्देशांकाची मांडणी केली जाते