मुंबई: अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं १९९३ साली 'मिस इंडिया' हा खिताब आपल्या नावावर केल्यानंतर सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तिनं सलमान खानच्या 'जब प्यार किसी से होता है' या सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'वास्तव','कच्चे धागे' सारख्या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेची प्रशंसाही करण्यात आली. खूप कमी वेळात तिचं बॉलीवूडमध्ये नाव झालं. पण नम्रता शिरोडकरनं करिअरच्या अगदी चांगल्या वळणावर असताना अचानक तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्न केलं आणि सिनेजगताला 'अलविदा' म्हटलं.नम्रता शिरोडकरच्या या निर्णयानं तिच्या चाहत्यांना मोठा झटका बसला होता. कोणाालाच कळत नव्हतं की नम्रताचं करिअर इतकं चांगलं सुरू असताना तिनं लग्न का केलं आणि सिनेमाकडे का पाठ फिरवली? आता लग्नाच्या १७ वर्षानंतर नम्रता शिरोडकरनं याविषयी काही खुलासे केले आहेत.
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट २००० सावी 'वामसी' या सिनेमाच्या सेटवर झाली. आणि त्यानंतर दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रतानं सिनेमाकडे पाठ फिरवली आणि ती तिच्या कुटुंबात रमली. एका मुलाखतीत नम्रतानं लग्नानंतर सिनेमा का सोडला याविषयी मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली,'मी खूप आळशी होती. जसं मी नेहमीच म्हणत आलेय की मी काहीच प्लॅन केलं नव्हतं. जे झालं ते सहज घडत गेलं,मला कुणीही त्यासाठी जबरदस्ती कशाचीच केली नव्हती. सर्वस्वी निर्णय माझा होता. लग्नानंतर माझं करिअर मागे पडले याला मीच जबाबदार आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की मी जो निर्णय घेतला,तो योग्य निघाला आणि त्यामुळे मी आज आनंदी आहे. जेव्हा मी अभिनयक्षेत्रात आले होते तेव्हा मी खूपच आळशी होते. मी अभिनय क्षेत्रात आले होते कारण मला मॉडेलिंग करून कंटाळा आला होता''.
नम्रता शिरोडकर पुढे म्हणाली,''मॉडेलिंग नंतर अभिनय पुढचं लक्ष्य होतं. आणि जेव्हा मी अभिनयाला थोडं सिरियसली घेतलं,माझं काम एन्जॉय करायला लागली तेव्हा माझी ओळख महेशशी झाली. आणि आम्ही लगेच लग्न केलं. जर मी माझ्या कामाला गंभीरपणे घेतलं असतं तर कदाचित माझं आयुष्य आता आहे त्यापेक्षा वेगळं असतं. मी यासाठी कोणतीच तक्रार करत नाही. माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण तो होता जेव्हा मी आणि महेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. लग्नाचा माझा अनुभव खूपच सुंदर आहे. त्यानं माझ्या आयुष्यात आनंद आणला,माझं आयु्ष्य बदललं त्यामुळे. आई होण्याचा अनुभवही खूप वेगळा होता. मला नाही वाटत करिअरसाठी मी या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला हव्या होत्या''.
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूनं आपला सिनेमा 'अथाडू' चं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लगेच २००५ मध्ये लग्न केलं होतं. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. नम्रता सध्या हैदराबाद मध्ये राहत आहे आणि महेश बाबूचं सिनेमासंदर्भातील सगळं काम ती सांभाळते. ती आता निर्माती देखील बनली आहे. तिनं २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'मेजर' सिनेमाची निर्मिती केली होती.