राज्यपालांवर नुपूर शर्मांप्रमाणे कारवाई का नाही? उदयनराजेंचा भाजपला सवाल

पुणे : मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतं आहे. अवमान करणाऱ्यांमध्ये भाजपशी निगडीत लोक आणि नेते अधिक आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज पुणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे देखील सामील झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका करताना सवाल उपस्थित केला.उदयनराजे म्हणाले की, आजचा मोर्चा पाहून सर्वांना समजून घ्यायला हवं की, साडेतीनशे वर्षानंतरही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मोठा आदर पाहायला मिळतो. मी रायगडला गेलो तेव्हा वेदना झाल्या. ज्या रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला, त्याच रायगडावर शिवसन्मानाचा निर्धार करायला जावं लागलं, याची खंत वाटते.



उदयनराजे पुढं म्हणाले की, काही फुटकळ लोक महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व्हायला हवा, हे सांगण्याची गरज पडते यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. याआधी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. यात पक्षीय राजकारण नाही. मात्र वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर अशी कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबत ही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत नुपूर शर्माप्रमाणेच कारवाई व्हायला हवी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.नुपूर शर्मा यांनी प्रेषीत मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे मुस्लीम समाज आक्रमक झाला होता. शिवाय मुस्लीम देशांमधूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने तातडीने पक्षातून नुपूर शर्मा यांचं निलंबन केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने