वेळप्रसंगी उदयनराजे भाजपमधून राजीनामा देतील; सुषमा अंधारेंचा दावा

पुणे : मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतं आहे. अवमान करणाऱ्यांमध्ये भाजपशी निगडीत लोक आणि नेते अधिक आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज पुणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे देखील सामील झाले होते. यावेळी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.



सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल पद याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण त्यावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा ना मुख्यमंत्र्यांनी की उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखलं. ना ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही. महापुरुषांच्या बदनामेच सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.यावेळी सुषमा अंधारे यांनी उदयनराजे यांच्या मूक मोर्चातील सहभागावर म्हटलं की, उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा ही देतील. तसेच उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहाटीला, गावं कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असंही अंधारे यांनी नमूद केलं. तसेच एकनाथभाऊ बाजूला बसले असून महाराष्ट्राचे स्टेरिंग देवेंद्रजींच्या हातात आहे, असा दावाही त्यांनी केला.

याआधी उदयनराजे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की काही फुटकळ लोक महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व्हायला हवा, हे सांगण्याची गरज पडते यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. याआधी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. यात पक्षीय राजकारण नाही. मात्र वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर अशी कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबत ही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत नुपूर शर्माप्रमाणेच कारवाई व्हायला हवी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने