पंत कसा होणार बरा?.. मंत्र्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वच लावत आहेत रांगा

मुंबई:  भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतला अपघातानंतर देहरादून येथील मॅक्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. मात्र जेव्हापासून ऋषभ पंतला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेव्हापासून त्याला पाहण्यासाठी, त्याची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात मंत्री, अधिकारी आणि अभिनेत्यांच्याही रांगा लागत आहेत. यामुळे पंत कुटुंबीय चांगलेच त्रस्त झाले आहे.दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाशी बोलाना पंतवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीम मधील एका सदस्याने सांगितले की, 'ऋषभ पंतला शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्टीकोणातूनही पुरेशी विश्रांती मिळणे खूप गरजेचे आहे. त्याला अजूनही वेदाना होत आहेत. त्याला सातत्याने येणाऱ्या लोकांशी बोलावे लागते. यामध्येच त्याची बरचशी शक्ती वाया जाते. जर पंतला लवकर बरे व्हायचे असेल तर त्याला त्याची शक्ती वाचवून ठेवणे गरजेचे आहे. जे लोक त्याला भेटण्यासाठी येण्याचा विचार करत आहेत. त्यांनी आता भेटण्यासाठी येणे टाळावे. त्याला विश्रांती घेऊ द्या.'







रूग्णालयातील दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'सध्या तरी पंतला भेटण्यासाठी येणाऱ्यांकरिता कोणतेही नियोजन केलेले नाही. रूग्णालयात भेटीची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते 5 अशी आहे. या वेळेत एकावेळी एकाच व्यक्तीला रूग्णाला भेटण्याची परवानगी आहे. मात्र ऋषभ पंतची केस हाय प्रोफाईल आहे. त्यामुळे रूग्णालयात भेटीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच समस्या निर्माण होत आहे.' ऋषभ पंतला आतापर्यंत अभिनेता अनुपम खेर, अनिल कपूर, क्रिकेटपटू नितीश राणा, खानपूरचे आमदार उमेश कुमार, स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतची अतिदक्षता विभागामध्ये जाऊन भेट घेतली. याचबरोबर दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा संघ, संघाचे संचालक शाम शर्मा यांनी देखील पंतची भेट घेतली होती.दरम्यान, रविवारी रात्री ऋषभ पंतला अतिदक्षता विभागातून मधून खासगी रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. याबाबतची माहिती रूग्णालयाच्या सूत्रांकडून मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने