सातारा: अजिंक्य उद्योग समूहावर टीका करून नेहमीचे तुणतुणे वाजवणे खासदार उदयनराजेंनी बंद करावे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केली.अजिंक्यतारा उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल ३६० कोटींची आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून, अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. उदयनराजेंनी अशी एखादी संस्था उभी करून कोणाच्या संसाराला हातभार लावला याचे उत्तर द्यावे.
टोलनाके चालवणारे कसे काय छत्रपतींच्या घराण्यात जन्मले, हेच कळत नाही. छत्रपतींचा वारसा सांगून टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा घणाघातही शिवेंद्रसिंहराजेंनी केला.आगामी निवडणुकीत सातारा नगरपालिका यांच्या भ्रष्टाचारातून मुक्त करणार, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिला. शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. सुरुची येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'उदयनराजे हे सातत्याने अजिंक्य उद्योगसमूहावर टीका करत आहेत. मात्र, अजिंक्य उद्योगसमूह हा साडेतीनशे कोटींचा नेटवर्थ असलेला कारखाना आहे. शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसांत दिली जातात.
सूतगिरणीत दोनशे कामगार असून, तीन कोटी पगार आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात. सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योगसमूहाचे मोठा हातभार आहे. त्यांनी काहीच केलेले नाही, त्यामुळे ते अजिंक्य उद्योगसमूहाच्या भ्रष्टाचाराचे नेहमीचे तुणतुणे वाजवत असून, ते त्यांनी बंद करावे.''उदयनराजेंनी अशी एखादी संस्था उभी करून कोणाच्या संसाराला हातभार लावला याचे उत्तर द्यावे. सातारा शहरासाठी डीपीडीसी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हद्दवाढ भागात कामांचा पाठपुरावा आणि त्याला निधीची उपलब्धता मी सातत्याने केली आहे. उदयनराजेंच्या एकाही विकासकामाचे श्रेय घेण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. मात्र, सातारा पालिका त्यांच्या सातारा विकास आघाडीने धुवून खाल्ली.'
गेल्या पाच वर्षांत त्यांना एकही मोठा प्रोजेक्ट पूर्ण करता आलेला नाही. जिल्हा बँक निवडणुकीत आपली राजकीय ताकद नव्हती, तेव्हा आपण माझ्याच केबिनमध्ये येऊन बसला होतात. अजिंक्यतारा बँकेच्या ठेवी सुरक्षितपणे मर्ज झालेल्या बँकेत हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.कोणत्याही ठेवीला धक्का लागला नाही. एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झालेला नाही. हे आधी उदयनराजे यांनी समजून घ्यावे आणि मग डायलॉग बाजी करावी. समजत नसेल तर एखादा शहाणा स्वीय सहायक ठेवून त्याच्याकडून समजून घ्यावे, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.टोलनाके चालवणारे राजघराण्यात कसे काय जन्माला आले, असा प्रश्न करून टोलनाक्यावर मारामारी, दादागिरी, वसुली असले प्रकार कोणाच्या सांगण्यावरून घडतात हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे.टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला शिकवू नये. ही त्या आगामी काळात पालिका आम्ही भ्रष्टाचारामुक्त करणार असून, आपल्या भावनिक राजकारणाचे दिवस आता संपलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी उदयनराजेंवर केली.डायलॉग मारण्यापलीकडं त्यांना काही काम उरलेलं नाही
मिशा काढीन, भुवया काढीन, असले डायलॉग मारण्यापलीकडे काही काम त्यांना उरलेले नाही. ते नेहमीच समोरासमोर या आणि होऊन जाऊ द्या असे म्हणतात; पण समोरासमोर येऊन करायचे काय, तुमचा पाच वर्षांचा भ्रष्टाचारी कारभाराचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच तुम्ही भावनिक राजकारण करत आहात, ते दिवस आता संपलेले आहेत.सातारा पालिका भ्रष्टचारमुक्त करण्यासाठी आम्ही तयारी केली असून, लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला सातारकर नारळ देतील.बाजार समितीत उदयनराजेंशी तडजोड नाही..सातारा बाजार समितीच्या आखाड्यात आपल्याकडे युतीचा प्रस्ताव आलेला आहे का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले, ‘‘उदयनराजेंना वगळून आमचे स्वतंत्र पॅनेल बाजार समितीत असेल. आम्ही निवडणुकीला पूर्णपणे सज्ज आहोत.आमच्याशी आमदार महेश शिंदेंनी चर्चा करण्याचे ठरवल्यास आम्ही चर्चा करू.’’ स्थानिक परिस्थिती बघून योग्य निर्णय घेतला जाईल; पण खासदारांशी कोणतेही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.