नवी दिल्लीः परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज चीनच्या कुरापती आणि अरुणाचल प्रदेशबद्दल भाष्य केलं आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा एक अविभाज्य भाग असून चीन मनमानीपणे तिथल्या प्रदेशांना नावं देत असेल तरी वास्तव बदलणारं नाही.अरिंदम बागची पुढे म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या काही भागांचे नाव चीनकडून बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. या समस्येचं निराकरण भारत आणि चीनला करावं लागेल. जर कुणी भारताचं समर्थन करत असेल तर चांगलं आहे. परंतु त्यांच्या समर्थन करण्याने किंवा न करण्याने काहीही बदलणार नाही.
चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावं बदलली आहेत. परंतु अशी मनगढंत नावं ठेवल्याने वास्तुस्थिती बदलणार नसल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. चीनने मागील सहा वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अशी कुरापत केली आहे. अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांच्या चिनी नावांनी घोषणा केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशमधल्या तिबेटच्या दक्षिणी प्रदेशाला 'जांगनान' म्हणत आपल्या देशाचा भाग असल्याचं सांगत आहे.या प्रकारावर अमेरिकेने म्हटलंय की, अरुणाचल प्रदेश भारताचा एक अविभाज्य भाग असून नाव बदलण्याच्या कुपरातींचा आम्ही विरोध करतो. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कैरिन ज्यां-पियरे यांनी मंगळवारी सांगितलं की, अमेरिका भारताच्या या भूभागाला कित्येक वर्षांपासून भारताचाच भाग असल्याची मान्यता देत आलेला आहे. त्यामुळे नाव बदलण्याच्या कारनाम्यांचा आम्ही निषेध करतो.चीनचे १ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशातल्या ११ ठिकाणांची मनमानीपणे नावं जाहीर केली. याला ते तिबेटचा दक्षिणी विभाग जंगनान म्हणत आहेत. चीनच्या कॅबिनेटने अशा नावांना मंजुरी दिली आहे.