टोमॅटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता

नवी दिल्ली - मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. त्यातच टोमॅटोचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार आगामी काळात टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनी म्हटलं की, आवक घटल्याने टोमॅटोचे किरकोळ बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे.




दिल्लीतील आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अशोक कौशिक म्हणाले, "अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो १६० रुपयांवरून २२० रुपयांपर्यंत वाढले असून, त्यामुळे किरकोळ दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटो, शिमला मिरची व इतर हंगामी भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान प्रमुख उत्पादक राज्यांणध्ये मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने महिनाभरापासून टोमॅटोचे दर वाढत आहेत.आझादपूर भाजी मार्केटचे घाऊक व्यापारी संजय भगत यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाला वाहतूक करण्यात खूप अडचणी येत आहेत. उत्पादकांकडून भाजीपाला आणण्यासाठी नेहमीपेक्षा सहा ते आठ तास जास्त लागत आहेत. अशा परिस्थितीत टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोच्या आसपास पोहोचू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने