खाली बसून मांडी घालून जेवणं का महत्त्वाचं?

“गेले अनेक दिवस आमची खाली बसून ठेवायची सवयच मोडली होती पण नशीब परत ते सगळं आम्ही सुरू केलं आणि ​बरंच बरं आहे. माझा कॉस्टिपेशनचा त्रास कमी झाला.”

विवेक मला सांगत होता. मार्केटिंग व्यवसाय असल्याने उभ्या उभ्या जेवण किंवा येता जाता काहीतरी खाण्याची गेली अनेक वर्षे सवय झाली होती.

आहारात बदल केल्यावर तात्पुरतं फरक जाणवे आणि पुन्हा सगळे पाढे पंच्चावन ! ऑफिसमध्ये पाच सहा तास काम खुर्चीत बसून. किमान जेव्हा उभ्याने जेवावं अशी स्वयंशिस्त त्याने घालून घेतली होती. त्याला गेले ३ महिने किमान एक जेवण खाली बसून मांडी घालून जेवायचं असं ठरवलं आणि त्याने ते पाळलं देखील! अनेकदा उभं राहून जेवताना जेवणाचा अंदाज येत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जेवलं जातं. भारतीय खाद्य पदार्थांबरोबरच भारतीय बैठक आणि आहार पद्धती यांना पूर्वापार महत्त्व आहे. अनेक पाश्चात्य देशांमध्ये अजूनही कुतूहलाने बोललं जातं आणि अनेक शास्त्रज्ञांसाठी हा संशोधनाचा विषय आहे.




सुखासन हे मूलभूत आणि महत्त्वाचे आसन आहे . मुळात आशियाई देशांमध्ये मांडी घालून बसणे हा अत्यंत जुना आणि संस्कृतीचा भाग आहे. अनेक पिढ्यांपासून आपल्याला शांतपणे मांडी घालून जेवायला शिकवले जाते. अनेक पिढ्यांपासून या प्रकारची संस्कृती आचरणात आणली जाते. किंबहुना भारत आणि जपानसारख्या देशांमध्ये जिथे योग आणि झेन अशा प्रकारच्या तत्वांना आरोग्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तिथे सुखासन या आसनाबद्दल अनेक जण आग्रही असतात बरेच जण सुखासनात बसायला लागल्यानंतर त्यांचा मानसिक ताण कमी होतो. त्यांचे पचन सुरळीत होते शिवाय मेंदूतील पेशींच्या जंजाळावरदेखील त्याचा उत्तम परिणाम होतो.

आणखी वाचा: Health Special: पाणी पिणं इतकं का महत्त्वाचं?
गुडघेदुखी होऊ नये म्हणून मांडी घालून बसण्याचा व्यायाम नियमित केला जातो. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास सुखासनात बसणं मुश्किल होऊन जातं.
मात्र अनेक संशोधन असे सांगते कि गुडघ्याचे विकार कमी कारण्यासाठी सुखासनात बसणे अत्यंत महत्वाचे आहे . तुम्ही सुखासनात बसल्यानंतर तुमचं शरीर, तुमची बुद्धी आणि मन या तिघांचं एक संतुलन साधले जाते. ज्यामुळे भुकेच्या संप्रेरकांचे संतुलन राखले जाते तसेच आहाराचे प्रमाण निश्चित करण्यासाठीदेखील मदत होते.

तुम्ही म्हणाल पण आता आपण टेबल खुर्चीवर बसतो त्याचं काय मात्र टेबल खुर्चीवर बसल्याने तुमचे पचन सुधारेलच असे नाही त्यामुळे भारतीय बैठकीत बसणे किंवा भारतीय बैठक ही आत्तापर्यंतची उत्तम जेवणाची पद्धत आहे. आपण सुखासनाबद्दल बोलतो, सुखासन दोन प्रकारचे असतात एक म्हणजे जमिनीवर मांडी घालून बसणे. ज्यांना पाठीचे आजार असतात किंवा मागे रेलून बसणे जास्त सोयीचे असते अशांसाठी केवळ पाय दुमडून बसण्याचा सल्ला दिला जातो .

सुखासन करताना शरीराचा वरचा भाग म्हणजेच छातीचा भाग आणि मणका यांच्या स्नायूंमध्ये योग्य संयोजन करून गुडघ्यांवर हलक्या प्रकार प्रमाणात दाब देऊन आपण जमिनीवर बसतो. सुखासन करताना आपण खाली एखादी रजई किंवा आसन देखील घेऊ शकतो.

सुखासनामुळे तुमचा मानसिक ताण कमी व्हायला मदत होते तसेच सुखासनामुळे तुमच्या हृदयाची क्षमता कार्यक्षमता वाढते तसंच तुमचे रक्तदाबाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुखासन अत्यंत उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यासाठी म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी सुखासन अत्यंत उपयुक्त आहे.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी नेहमी नियमितपणे सुखासनात बसून जेवावे. आम्ही नेहमी सांगतो की जेवताना आणि पाणी पिताना शक्यतो बसून पाणी प्या किंवा बसून जेवण करा त्यानिमित्ताने तुमची पचनक्रिया सुलभ होते आणि स्नायूंचे आरोग्य देखील वाढते. किंबहुना सुखासन करण्यासाठी अवघड वाटत असल्यास वजन वाढतंय असे समजावे आणि त्याप्रमाणे वजनावर आणि विशेषतः स्नायूंच्या लवचिकतेवर काम करायला सुरुवात करणे कधीही उत्तम !

विशेषतः कमरेच्या स्नायूंसाठी आणि पोटांच्या स्नायूंसाठी सुखासन हे महत्त्वाचे आसन आहे. तुम्ही जर रोज धावणारे असाल तर सुखासनात बसल्यामुळे तुमची स्नायूंची लवचिकता वाढते आणि धावताना शरीराचा तोल योग्य प्रकारे सावरण्यासाठी मदत होते .

जेवणावर लक्ष केंद्रित होणे त्या निमित्ताने अतिरेकी खाणे टाळले जाणे तसेच शरीराचे संतुलन वाढणे या सारख्या विविध गुणांमुळे दिवसातील किमान एक जेवण सुखासनात बसून करणे आवश्यक मानले जाते.

भारतीय पदार्थ आणि आहार शास्त्रातील भारतीय बैठकीचे महत्व दुर्लक्षित करून चालणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने